लातूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदान येथे सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ‘आम्ही लातूरकर’च्या वतीने दि. १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले असून केंद्र सरकारने वांगचुक यांच्याशी तातडीने चर्चा करावी, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
देशात झालेल्या नीट पेपर फुटीच्या घटनेविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु आहे. गेल्या १९ दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे वजनही झपाट्याने कमी झाले आहे. मात्र,केंद्र सरकारने अद्याप कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे हे प्रकरण दिल्ली सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
‘आम्ही लातूरकर’च्या वतीने या निवेदनाद्वारे केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन त्यांच्याशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. संवादातून प्रश्न सोडवणे हेच लोकशाहीचे खरे वैशिष्ट्य असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अॅड. उदय गवारे, माधव बावगे, रमेश बिरादार, प्रा. हर्षवर्धन कोल्हापूरे, प्रा. दत्ता सोमवंशी, अॅड. धनंजय झाडके, डॉ. गणेश गोमारे, प्रा. अर्जून जाधव, अॅड. जे. एच. शेख, अॅड. गणेश यादव, सुनील कदम, कॉ. विश्वंभर भोसले, अॅड. भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील, बाळासाहेब यादव, खंडेराव गंगणे, लता बावगे, मीरा देशमुख, अॅड. राजेंद्र येळकर, सोहम कवठेकर, प्रा. दशरथ भिसे, अॅड. सुशील सोमवंशी, अॅड. रामराजे अत्राम, अनिल दरेकर, उत्तरेश्वर बिराजदार, अनिल मुदगले, रुक्साना मुल्ला, रंजना हसुरे, जयश्री कदम, सहारा शेख, अर्चना पाटील, जमील नाना, महेश माने यांचा समावेश होता.
















