लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित २१४ शाळांची नोंदणी झाली आहे. या शाळेत १ हजार ८५७ जागेवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी गेल्या चौदा दिवसापासून पुन्हा नव्याने प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्याचा दिवस शिल्लक राहिला आहे. या चौदा दिवसात आरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर ४ हजार ४४७ पालकांनी अर्ज भरले आहेत.
शिक्षण विभागाने या वर्षापासून जिल्हयातील सर्व अनुदानीत शाळा व व्यवस्थापनाच्या शाळा अशा सर्व शाळामध्ये आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी प्रक्रीया सुरू केली होती. मात्र त्या प्रक्रीयेस पालकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. तसेच या प्रवेश प्रक्रीयेच्या संदर्भाने कांही पालक न्यायालयात गेल्याने न्यायालयाने पुन्हा जुन्याच पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविण्याच्या निर्णय दिला. त्यामुळे अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया स्वंय अर्थसहित, ज्या शाळांना अनुदान नाही अशा २१४ शाळांची यावर्षी नोंदणी झाली असून १ हजार ८५७ जागेवर मोफत प्रवेश होणार आहेत. दि. १६ मे पासून पुन्हा नव्याने आरटीईच्या पोर्टलवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी लातूर जिल्हयातील २१४ शाळेतील १ हजार ८५७ मोफत प्रवेशासाठी ५ हजार ९६७ पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज तयार केले. त्यापैकी १ हजार ५२० पालकांनी मोफत प्रवेशासाठी अर्ज तयार केला. तो दाखल केला नाही. तर ४ हजार ४४७ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. यात लातूर तालुक्यातून १ हजार ७६७ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच रेणापूर तालुक्यातून ७९, औसा तालुक्यातून १९३, निलंगा तालुक्यातून २७८, शिरूर अनंतपाळ तालुक्यातून १२, देवणी तालुक्यातून ८२, उदगीर तालुक्यातून ६२९, जळकोट तालुक्यातून २३, अहमदपूर तालुक्यातून ३००, चाकूर तालुक्यातून ९४ पालकांनी आरटीईच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज दि. ३१ मे पर्यंत ऑनलाईन भरता येणार आहेत. त्यासाठी एक दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे.