लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी बागायतीचे क्षेत्र ब-याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी खरीपाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यामुळे यावर्षी ६ लाख ५९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होईल असा कृषि विभागाचा अंदाज आहे. खरीप हंगामात पिकांसाठी लागणारा रासायनीक खतांचा तुटवडा जाणवू नये, म्हणून जिल्हा स्तरावर ८५५ मेट्रीक टन डीएपी, युरिया खताचा साठा संरक्षीत करण्यात आला आहे.
जिल्हयात यावर्षी ६ लाख ५९ हजार ७००० हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर तुर, ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मुग, ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर उडीद, १० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ३ हजार हेक्टरवर बाजरी, ३ हजार हेक्टर क्षेत्रावर मका, २०० हेक्टरवर साळ, ३०० हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, ३०० हेक्टर क्षेत्रावर तीळ, २०० हेक्टरवर लहान कारळे, १०० हेक्टरवर सुर्यफूल या पिकांचा पेरा होणे अपेक्षित आहे. तसेच ८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूसाची लागवड होणार आहे.
खरीप हंगामासाठी लातूर जिल्हयास १ लाख २३ हजार मेट्रीक टन खताला मंजूरी मिळालेली आहे. जिल्हयात खरीप हंगामात सरासरी ९६ हजार मेट्रीक टन खताचा वापर होतो. एप्रिल मध्ये ८४ हजार ७०० मेट्रीक टन खत उपलब्ध पैकी २ हजार ५०० मेट्रीक टन रासायनीक खताची विक्री झाली आहे. सध्या ८२ हजार मेट्रीक टन खत शिल्लक आहे. यात युरिया १७ हजार मेट्रीक टन, डीएपी ५ हजार मेट्रीक टन, एनपीके ४६ हजार मेट्रीक टन, एसएसपी १२ हजार मेट्रीक टन, एमओपी १२०० मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे.