जालना जिल्ह्यात अनुदानाचा अपहार
जालना : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानाच्या ३४ कोटी ९७ लाखांच्या अपहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला असून, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाची आता मराठवाड्यात चौकशी होणार आहे. यासाठी अप्पर जिल्हाधिका-यांच्या नेतृत्व प्रत्येक जिल्ह्यात चौकशी पथक नेमण्याचे आदेश संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दिले.
विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अनुदान वाटपाची हे जिल्हानिहाय पथक चौकशी करणार असून यात शेतकरी नसलेले व्यक्ती, सरकारी अथवा अकृषक जमिनीवर शेती दाखवून किंवा डबल अनुदान लाटले आहे का, याची चौकशी केली जाणार आहे.
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यानंतर विभागीय आयुक्तांचे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टी अनुदानाची चौकशी करण्यासाठी सुधारित आदेश जारी केले आहेत.
५ वर्षांतील अनुदान
वाटपाची चौकशी होणार
मराठवाड्यात जिल्हानिहाय अप्पर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी पथककडून चौकशी केली जाईल. संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत सुधारित आदेश जारी केले. आता मागील ५ वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे वाटप झालेल्या अनुदानाची चौकशी होणार आहे.
कशाची चौकशी होणार?
या चौकशीत शेतकरी नसलेले व्यक्ती, शासकीय तसेच अकृषक जमिनीवर शेती दाखवून अनुदान वितरीत केलेले व्यक्ती, एकापेक्षा अधिक वेळा अनुदान वितरीत केलेले व्यक्ती इत्यादींना अनुदान वितरीत झाले का याची चौकशी जिल्हानिहाय नियुक्त पथक करणार आहे.