लातूर : प्रतिनिधी
अनुसूचित जातीतील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा तसेच सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यात यावे आणि सामाजिक न्याय व सलोखा कायम राखावा, या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने पुणे ते मुंबई असा लॉग मार्च आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी बाबा साळवे यांच्या समाधीस्थळापासून १७ जून रोजी या लॉग मार्चला प्रारंभ होणार असून २४ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य मोर्चा व आंदोलनाने त्याची सांगता होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे, नातू सचिनभाऊ साठे, गणेशभाऊ भगत, अण्णा भाऊ साठे यांची नाती व नातजावई, अॅड. टी. एन. कांबळे आणि राज क्षीरसागर हे करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी राज क्षीरसागर अॅड. टी. एन. कांबळे, सुरेश चव्हाण, आनंद वैरागे, डी. एल. वाघमारे, सचिंद्र कांबळे, किशोर शिंदे, पिराजी साठे, अशोक गायकवाड, नेताजी मस्के, राहुल क्षीरसागर, विजय गव्हणे, राहुल घोलप, अर्जुन बावरी, नारायण जोगदंड, सुनील जोगदंड, आकाश लोंढे, सूरज लोंढे, श्रीधर आवळे आदी उपस्थित होते.
















