मुंबई : ‘दिशा सालियानच्या मृत्यूबाबत वडिलांनी संशय व्यक्त केला होता, तर पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? अपघाती मृत्यूचे प्रकरण का दाखल केले? कोणत्या बाबींमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यापासून रोखण्यात आले?’ असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित केला.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. चौकशीअंती दिशाने जीव दिल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी याचिका करून आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप केला आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंतीही सालियन यांनी अॅड. निलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे.
याविषयी न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बाजू मांडली. शिशिर हिरे यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची नोंद ‘अपघाती मृत्यू’ अशी करण्यात आली होती आणि दोनदा चौकशी करण्यात आली; दोन्ही वेळा तिने जीव दिल्याचेच निष्पन्न झाले. या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांवरूनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाला, असे ते म्हणाले.
फोटोनुसार दिशाच्या डोक्याला दुखापत
न्यायालयाच्या खंडपीठाने असाही प्रश्न उपस्थित केला की, शवविच्छेदन अहवालानुसार, इतक्या उंचावरून पडूनही संबंधित व्यक्तीच्या शरीरावर कोणतीही दुखापत का आढळली नाही. जर एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या उंचीवरून खाली पडली, तर तिच्या शरीरावर काहीच जखमा होणार नाहीत का? असा प्रश्न न्यायमूर्ती डांगरे यांनी विचारला. त्यावर हिरे यांनी सांगितले की, छायाचित्रांनुसार संबंधित व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली होती. पुढील सुनावणी २४ ऑगस्टला आहे.
















