गडचिरोली : प्रतिनिधी
पाकिस्तान या शत्रूराष्ट्राने दिलेल्या युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला. पण आम्ही दोन महिन्यांपासून देत असलेल्या शांततेच्या प्रस्तावाकडे सरकारने दुर्लक्ष केले, असा आरोपही केला. नक्षलवाद्यांनी यासंबंधी एक पत्रक काढले असून त्यात केंद्र सरकारवर हे आरोप केले. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या बसवराजूच्या तालमीत अनेक युवा कॉम्रेड नेतृत्वासाठी सक्षम असल्याचेही नक्षलवाद्यांनी म्हटले.
माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता विकल्पने हे पत्रक जारी केले. सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजू मारला गेल्यानंतर माओवाद्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला. पण दोन महिन्यांपासून आम्ही देत असलेल्या शांततेच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. आमचा क्रांतीचा लढा थांबणार नाही, बसव राजूच्या तालमीत तयार झालेले अनेक युवा काम्रेड नेतृत्वासाठी सक्षम असल्याचेही नक्षलवाद्यांनी म्हटले.
नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे एप्रिल २०२५ मध्ये शांततेच्या प्रस्तावावर चर्चा करायची आहे. त्यामुळे एक महिन्यासाठी नक्षलवादविरोधी ऑपरेशन थांबवावे, अशी मागणी केली होती. या दरम्यान आम्हीही गोळीबार करणार नसल्याचे म्हटले होते. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात धडक कारवाई करताना त्यांच्या शांतता प्रस्तावानंतर लगेच त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. परंतु आम्ही शांततेसाठी प्रयत्न करूनही सरकार आमचा विचार करीत नाही, अशा शब्दांत नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला.