नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन मिळते. दरम्यान, आता केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन नियमावली लागू केली असून, शिधापत्रिकेची ई-केवायसी केली नाही, तर १ नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे.
कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे खूप आवश्यक आहे. आता सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केली होती. मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसीसाठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही. अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत. ई-केवायसी नसलेल्या शिधापत्रिका रद्द केल्या जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट सूचित करण्यात आले आहे.
हयात नसलेल्यांची
नावे वगळली जाणार
रेशनकार्डवर बरीच नावे अशी आहेत, जे हयात नाहीत. त्यामुळे ती नावे वगळली जाणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत, या सर्वांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाणार आहे.