धाराशिव : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ने मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवमध्ये सोशल मीडियावर सक्रिय आणि लोकप्रिय असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला या घडामोडींमुळे फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून जवळपास २० हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. तसेच फेसबुकवरही सुमारे ६ हजार लोकांनी त्यांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तरुण वर्गाकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाऊन वेगळा गट स्थापन केला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र प्रत्यक्ष बैठकीला केवळ चार खासदार उपस्थित राहिले होते, तर उर्वरित खासदार ऑनलाईन सहभागी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा वेगाने सुरू झाली होती.
या बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांतच अनेक खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बंडखोरीनंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थक संतप्त झाले असून, त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ‘गद्दार’ अशी टीका करत निषेध नोंदवण्यात आला.
सोशल मीडियावरील आकडेवारीतही या नाराजीचे प्रतिबिंब दिसून येत आहे. डिजिटल माध्यमांवरील लोकप्रियता ही आजच्या काळात नेत्यांच्या जनाधाराचे महत्त्वाचे मोजमाप मानली जाते. अशातच, ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. आता पुढील काळात ते या परिस्थितीचा सामना कसा करतात आणि आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा पुन्हा मजबूत करण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















