लातूर : प्रतिनिधी
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतीने अरज दि. १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक येथे अन्नसेवा देण्यात येणार असून ‘एक घास आपुलकीचा; लोकनायक संघटनेचा’या शीर्षकाखाली 1१०५ ब्रास मंडपामध्ये अन्न सेवा दिली जाणार आहे. या अन्न सेवा मंडपाचे लातूर शहर विभागीय पोलीस अधिकारी रनजीत सावंत व संतोष बेंबडे यांच्या हस्ते बुधवारी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकात भूमिपूजन करण्यात आले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकनायक सामाजिक संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याचाच भाग म्हणून यावर्षी डीजे डॉल्बी, स्वागत मंच, विद्युत रोषणाई यासारख्या लाखो रुपयाचा वाया जाणारा खर्च टाळून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून येणा-या अनुयायांना अन्नसेवा व पाणीसेवा दिले जाणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती असल्यामुळे १०५ ब्रासचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे, अशी माहिती संघटनेचे सल्लागार अॅड. बालाजी कुटवाडे यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवडे, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादूभाऊ रसाळ, सचिव बंटी गायकवाड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, पत्रकार नेताजी जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, सुनील बसपुरे, आनंद वैरागे, शाम चव्हाण, प्रीती माऊली लातूरकर, सर्फराज सय्यद, अनिल जाधव आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. या अन्न सेवेचा लाभ अभिवादनासाठी येणा-या सर्व अनुयायांनी घ्यावा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी किसन कदम यांनी केले आहे.