पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये लालपरी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी बसबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रताप सरनाईक हे पुण्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी एसटीमधील सर्व बस या इलेक्ट्रिक करण्यात येणार आहेत. तसेच पुढील १० वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व जुन्या बस बंद केल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, गावागावांमधील प्रवासासाठी सर्वजण एसटी बसचा पर्याय निवडतात. गावामधील शाळा व कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर केला जातो. सगळ्यांची आवडती लालपरी आता मॉडर्न होत आहे.
राज्यातील सर्व एसटी बस आणि डेपो अद्ययावत करण्याचे सरकारने हाती घेतले आहे. पुढील दोन महिन्यांत काम सुरू होणार असून सुरक्षा आणि स्वच्छता याचा विचार करून काम केले जाईल, असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले. एसटी खात्यात ५ हजार बस घेणार असून त्यापैकी एक हजार बस या इलेक्ट्रिक घेण्याचे संकेत त्यांनी दिले. पुढील काही वर्षांत एसटीच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील. २०२९ पर्यंत ताफ्यात २५ हजार बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून एसटी महामंडळाचे पुढील पूर्ण नियोजन सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, सरनाईक यांनी या स्मार्ट बसमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि सुरक्षितता यंत्रणा असतील असे स्पष्ट केले स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी यंत्रणा बसमध्ये असावी. तसेच आग किंवा इतर घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा बसमध्ये असणे आवश्यक असल्याचेही देखील मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
हळूहळू सुधारणा होतील
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाला सध्या ११ हजार कोटींचा संचित तोटा असून, यावर श्वेतपत्रिका काढणार आहे. जुन्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम सुरू केले जाईल, मात्र या सुधारणा लगेच न होता, पुढील अडीच वर्षांत हळूहळू होतील अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. तसेच यापुढे बसेस लिझवर न देता, काही ठिकाणी त्या तयार करून घेतल्या जातील आणि त्यांची मालकी एसटी महामंडळाकडेच राहील, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांचे केले कौतुक
विभागाला निधी देण्यावरून शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे तक्रार करत आहेत. तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांच्या निधी देण्यावरून कौतुक केले. परिवहन खात्याला अजित पवार सढळ हाताने निधी देत आहेत.