धाराशिव : प्रतिनिधी
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज सीबीआय विशेष न्यायालयाने निकालाचे वाचन केले. यावेळी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता ओमराजे निंबाळकर यांची प्राथमिक प्रतिक्रिया आली आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली असून त्यांनी निकाल दुर्दैवी आहे. उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका देखील बदलत आपण तूर्तास शिंदे गटात जाणार नाही. याचा निर्णय मतदार संघात जाऊनच दोन दिवसांत घेण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान, ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात होते. त्याचबरोबर तिथे अंबाबाई मंदिर विकास कामांचे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात अमित शहा देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे हे फोनवर बोलत बाहेर पडताना दिसले. पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर या तिघांची बैठक झाली. त्यात अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री, सीबीआयला या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
आता या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका बदलल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाच्या वाटेवर असलेले ओमराजे निंबाळकर हे तूर्तास तरी शिंदे गटात जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ते याबाबतचा निर्णय मतदार संघात जाऊनच घेणार आहेत. विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील उद्धव ठाकरेंचा फोटो हटवलेला नाही.
२० वर्षे आम्ही खूप भोगले : अर्चना पाटील
या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आम्ही २० वर्षे खूप भोगलं. कोणीही उठून आरोप केले. आमच्या कुटुंबाला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. आमच्यावर झालेल्ो आरोप व पद्मसिंह पाटील यांना झालेल्या अटकेनंतर सासूबाई धक्क्याने गेल्या. पद्मसिंह पाटील यांनी विविध मंत्रिपदे भूषविली होती. कोणताही गुन्हा केला नसताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला ते खूपच वेदनादायी होते. गृहराज्यमंत्री असणा-या माणसाला प्रचंड वेदना झाल्या. राणा जगजितसिंह यांना सतत गेली २० वर्षे हा तणाव सहन करावा लागला. माझ्या मोठ्या मुलांवरही याचा मानसिक परिणाम झाला होता.
















