मुंबई/धाराशिव : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले धाराशिवचे उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहे, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
राज्याच्या राजकरणात काहीदिवसांपाूसन मोठमोठ्या धक्कादायक घटना घडत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाचे ६ खासदार फुटले असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची मोठी चर्चा देशभरात रंगली. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवल्याची चर्चा होत होती. मात्र त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर ओमराजे निंबाळकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्याने ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, पण त्यात यश आले नाही. विरोधकांकडे राजकीय सत्ता आणि आर्थिक बळ दोन्ही आहे. ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही राजकारणात आलो, तेच लोक काँग्रेसच्या काळातही फोफावले आणि भाजपा सरकारच्या काळातही फोफावत आहेत. मर्यादित संसाधनांच्या जोरावर आम्ही किती काळ लढत राहणार? मला मनापासून वाटते की, आता आपणही सत्तेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ते पुढे म्हणाले, शेतक-यांसाठीच्या साध्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध नाही; दरवर्षी केवळ अंदाजपत्रके तयार केली जातात. सत्ता पाटील कुटुंबाच्या हातात आहे, ते स्वत: आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. मग आम्ही फक्त हतबल होऊन बघत राहायचे का?
नि:स्वार्थ काम करणारा शिवसैनिक : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
स्वत:साठी नाहीतर जनतेसाठी नि:स्वार्थ काम करणारा हा लोकप्रतिनिधी खरा कडवट शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रामाणिकपणे जनतेचे काम करत आहेङ्घ अशा नि:स्वार्थ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी मी कायम भक्कमपणे उभा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रत्येक सुखदु:खात मी सहभागी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि जनतेचे प्रश्नं सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो.
महाराष्ट्रभर माझी प्रतिमा चांगली
२०ह्यार्षांनंतरही पवनराजे प्रकरणात एकही आरोपी दोषी ठरला नाही; सर्वजण निर्दोष सुटले. राजकीय वैमनस्य आणि हत्येचा हेतू असल्याचे न्यायालयाने मान्य केले, तरीही सर्वजण सुटले! खासदार असूनही जर मी माझ्या स्वत:च्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकत नसेन, तर सामान्य जनतेसाठी काय आशा उरते? लोक म्हणतात की महाराष्ट्रभर माझी प्रतिमा चांगली आहे, पण केवळ प्रतिमा जपण्यासाठीच मी खासदार झालो आहे का? या लोकांना धडा शिकवण्यासाठीच मी इथे आहे. मी जो काही निर्णय घेईन, त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ लागेल. अनेक जण विचारत आहेत की मी त्यांच्यासोबत जाऊन बसेन का? मी त्यांच्यासोबत जाऊन बसणार नाही; उलट, मी त्यांचा थेट सामना करेन आणि त्यांना जाब विचारेन म्हणूनच मी हा निर्णय घेत आहे. मी कधीही तडजोड करणार नाही आणि त्या कुटुंबासाठी कधीही मते मागणार नाही,” असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
















