नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने उलटले आहेत. निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे काँग्रेससह ठाकरे गटाने ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. हाच आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील केला. ईव्हीएम मशिनमुळे महायुतीचे सरकार पुन्हा एकदा आले असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या संदर्भात अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केले आहे.
आमदार छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. राज्यासह देशामध्ये निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करावा की नाही याबाबत माध्यमांनी छगन भुजबळ यांना प्रश्न केला. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, मॉक पोल काय आहे ते मला माहिती नाही. काय करायचं ते करा. मी ते वाचलं आहे. मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला असता तर मी दीड-दोन लाख मतांनी निवडून आलो असतो. ६० हजार मतांनी मी नेहमीच निवडून आलो, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
पुढे त्यांनी पुन्हा एकदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख केला आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये ओबीसी आरक्षणावर जोरदार वाक्युद्ध झाले. याचा परिणाम निवडणुकीवर झाला असल्याचे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, या वेळेला केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झाले. ईव्हीएममध्ये गडबड असती, तर जरांगे येऊ आणि आणखी कोणी येऊ ईव्हीएमने उलटासुलटा करून मला दीड ते दोन लाख मताधिक्यावर पोहोचवले असते, अशी भूमिका अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे.