ट्रान्झेक्शन तपासणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीकडूनही चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच अशोक खरातच्या गैरकृत्यात सहभागी झालेल्या कुणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशोक खरातचे जे वेगवेगळ््या प्रकारचे ट्रान्झेक्शन आहे ते आम्ही शोधून काढत आहोत, असे ते म्हणाले.
अशोक खरातची संपूर्ण संपत्ती, त्याचे सर्व गैरव्यवहार आणि त्यांनी महिलांवर ज्याप्रकारे गैरवर्तन केले, त्या सर्व प्रकरणांची खोलवर चौकशी करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देवू. मला असे वाटते की, याबाबत महाराष्ट्रात सर्वांचे एकमत आहे. आमच्यासाठी तर कारवाई ही राजकारणाच्या पलिकडे आहे. पण काही लोक या प्रकरणावरूनही राजकारण करताना दिसत आहेत. पण आम्ही अशा प्रकारच्या राजकारणाला महत्त्व देत नाही. सरकारला जी कारवाई करायची आहे ती सरकार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवी माहिती समोर येत आहे. आता एसआयटी काय तपास करते हे रोज सांगता येणार नाही. एसआयटी योग्य वेळी माहिती देईल. मला असे वाटते की, आपल्याला एसआयटीवर विश्वास ठेवावा. एसआयटी उत्तम कार्य करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशोक खरातसंबंधी ईडीने सर्व काही माहिती घेतलेली आहे. त्यांनीही कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन आयडेन्टीफाय झाली की नियमानुसार त्यात जे-जे करायचे ते आम्ही करू. त्यामुळे या प्रकरणाची निश्चितपणे ईडी चौकशी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

