मुंबई : प्रतिनिधी
जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे. जॉईंट स्टेटमेंट जाहीर करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या जोरदार चर्चा होत्या. अखेर दोघांनी एकत्र स्टेटमेंट देत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जय आणि माहीने एकत्र स्टेटमेंटची पोस्ट शेअर केली आहे.
घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि या कथेत कोणीच ‘व्हिलन’ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लग्नाच्या तब्बल १४ वर्षांनंतर जय आणि माही विभक्त झाले आहेत. या दोघांना तीन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात समस्या होत्या. दोघांनीही आपले नाते वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु या प्रयत्नांना यश मिळाले नाही. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून दोघं वेगवेगळे राहत होते.
जय आणि माहीची पोस्ट
‘आयुष्याच्या या प्रवासात आज आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. तरीही आम्ही एकमेकांना साथ देत राहू. शांती, प्रगती, दयाळूपणा आणि माणुसकी ही नेहमीच आमची आयुष्यात मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत. आमची मुलं- तारा, खुशी आणि राजवीर यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम मित्र बनून राहू. त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे काही भविष्यात करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
माही आणि जय यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१७ मध्ये त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन मुलांना दत्तक घेतले. त्यानंतर २०१९ मध्ये माहीने मुलीला जन्म दिला. तारा असे तिचे नाव असून सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे.

