जालना : प्रतिनिधी
जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिका-यांना सादर केला आहे. जिल्ह्यात ३४ कोटी ९७ लाख रुपयांच्या रकमेचा घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या तपासात समोर आले आहे. समितीच्या तपासात २६ कर्मचारी दोषी आढळले असून अंबड तालुक्यातील १५ तर घनसावंगी तालुक्यातील ११ कर्मचा-यांचा यात समावेश आहे. दरम्यान, या ३४ कोटी ९७ लाख रुपयांपैकी आतापर्यंत एकूण ५ कोटी ७४ लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटीचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ८ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर समितीने आपला अहवाल आज जिल्हाधिका-यांना सादर केला आहे. या प्रकरणी चौकशी समितीने ७९ कोटींची रक्कम अक्षेपित काढली होती. त्यापैकी ७२ कोटी रुपयांची समितीने चौकशी केली असून ३४ कोटी ९७ लाख रुपयांची रक्कम अपहारित असल्याचे या चौकशीत निष्पन्न झाले असल्याची माहिती जालना जिल्हाधिका-यांनी दिली.