औसा : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यावर आमचे विशेष लक्ष आहे. बँकेकडून या तालुक्यातील शेतक-यांना नेहमी सहकार्य करीत झुकते माप देण्याचे काम केले असून तालुक्यातील मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याने अतिशय व्यवस्थित उच्चांक दर देऊन शेतक-यांना न्याय दिला आहे. भविष्यात औसेकरांना कारखाना व जिल्हा बँकेकडून सहकार्य करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असे सांगून आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मागच्या अनेक वर्षापासून आम्हाला साथ दिली तीच साथ, आशीर्वाद आमच्या उमेदवारांना आगामी काळात होणा-या बँकेच्या निवडणुकीत द्यावा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री, सहकारभुषण दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
औसा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी, पतसंस्था, मजूर, मत्स्य मतदारांची संवाद बैठक येथील हॉटेल तृप्ती येथे घेण्यात आली त्या वेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. या प्रसंगी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक अशोकराव गोविंदपूरकर, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, संचालक राजकुमार पाटील, जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष नारायणराव लोखंडे, बालाजी बिराजदार, मारूती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, हरिराम कुलकर्णी, रामदास चव्हाण, कोळपे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
माजी मंत्री, सहकारभुषण दिलीपराव देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्हा बँकेला जपले आहे. त्यातून या भागातील द्राक्ष बागायत, ऊस उत्पादक शेतक-यांना भरीव मदत जिल्हा बँकेकडून झालेली आहे त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँक मारूती महाराज साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याला पुढे घेऊन जायचे आहे. अधिकाधिक मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी कुठलाही विचार न करता राज्यात सहकार क्षेत्रातील नावलौकिक असलेल्या लातूरच्या शेतक-यांच्या विश्वासाला पात्र असलेल्या लातूरच्या विकासाला चालना देणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपली सर्वांची कल्पवृक्ष आहे. त्याला जपण्याची गरज आहे यासाठी आपण आमच्या पॅनलला विजयी करा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री, सहकारभुषण दिलीपराव देशमुख यांनी केले. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव गोविंदपूरकर यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन पी. सी. पाटील यांनी केले.
















