बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातून जाणा-या बीड ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या २ वर्षापासून काम सुरू आहे. याच महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते कामाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बीड ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील उखंडा तलावानजीक एका भरधाव वेगातील टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कैलास टुले, ऋषिकेश फुलझळके आणि अक्षय शिंदे अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. रस्त्याचे काम करताना सूचनाफलक लावण्याबरोबरच योग्य ठिकाणी बॅरिकेटिंग केली असती तर हा अपघात टाळता आला असता अशी चर्चा परिसरातील नागरिकांत होत आहे. मात्र, या दुर्घटनेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
















