सोलापूर : ज्वारीचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख असून सोलापूर जिल्हा हे ज्वारीचे कोठार मानले जाते. त्यामुळे ज्वारीपासून तयार होणाऱ्या पदार्थ निर्मिती व बाजारपेठेची सर्वात मोठी संधी स्थानिक बचतगट व उत्पादकांसमोर निर्माण झाली आहे. ज्वारीचे पोहे, रवा, चिवडा, फरसाण, इडली पीठ, शंकरपाळे या सारख्या अनेक खाद्यपदार्थांची मागणी वाढते आहे. यामध्ये कुकीज व बिस्किटांचा समावेश आहे. त्यासोबत नाचणी व बाजरीची उत्पादने घेणे शक्य आहे.
आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षामुळे भरडधान्य (मिलेट) उत्पादनांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैली नैसर्गिक व आरोग्यदायी आहार म्हणून मिलेटचा वापर वाढतो आहे. त्यासोबत बाजारात उलाढालीची संधी देखील वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष उत्साहात साजरे झाले. त्यासोबत मिलेटमधील ग्लुटेन मुक्त द्रव्ये, अनेक सूक्ष्म मूलद्रव्यांचा समावेश, जीवनशैलीच्या आजारापासून मुक्त ठेवण्याची क्षमता, प्रथिने व फायबरचा समावेश या सारख्या मुद्यावर मिलेट उत्पादने इतर उत्पादनांच्या तुलनेत उजवी ठरत आहेत. या उत्पादनांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहीसाठी देखील ही उत्पादने उपयुक्त ठरत आहेत.
उपवासाच्या पदार्थामध्ये सध्या शाबुदाणा व त्यापासून बनवललेल्या पदार्थाना पर्याय उपाय शोधला जात आहे. त्यासाठी भगर, राजगिरापासून तयार केलेली उत्पादने अधिक चांगली ठरू लागली आहे. यामध्ये आता चिवडा, चिप्स देखील तयार होऊ लागली आहेत. उपवासाच्या पारंपरिक पदार्थांना आरोग्यदायी व तेलकट नसलेला पर्याय शोषला जात आहे. त्यामुळे उपवासाच्या मिलेट पदार्थाची बाजारपेठ वाढीस लागली आहे.
आम्ही बाजरी, नाचणी, ज्वारी या तीनही प्रकारात चिवडा व इतर पदार्थ देतो. मिलेट वर्षामुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती झाली आहे. त्याचा फायदा विक्री वाढीसाठी झाला आहे. आम्ही सातत्याने मिलेट उत्पादनांची संख्या वाढवत आहोत. असे मुंबई येथील सुगरण बचत गटाच्या प्रिया रेवणकर यांनी सांगीतले.
फ्लेक्सप्रकारात मिलेट उत्पादनांची मागणी चांगली आहे. आम्ही उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर, राजगिरा मिलेट उत्पादने देत आहोत. त्याचा उपयोग लोकांकडून केला जातो. उपवासाच्या पदार्थात मिलेट उत्पादने आणल्याने व लोकांमधील जनजागृतीमुळे विक्रीत वाढ होत आहे. गायत्री बाविस्कर, डेली डिलीशियस बचत गट, नाशिक मिलेट वर्षामुळे निर्माण झालेल्या जागरूकतेचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला आहे. मिलेट उत्पादनांच्या विक्रीत ५० टक्क्यांनी वाढ होऊ लागली आहे. या घोषणेचा परिणाम अत्यंत चांगला ठरला आहे.असे अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथील श्रीदर्शनी बचतगटाच्या वनिता तंबाके यांनी सांगीतले.