लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरु झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने लातूर शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून रस्त्यांवर पाणी जमा झाल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या निर्देशानुसार तातडीने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लातूर शहरात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि शहरातील सकल भागात पाणी जमा झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. शहरात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय नियमानुसार आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीने करावी. मॉन्सूनपूर्व पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेवून महानगरपालिकेने शहरातील सर्व नाले, गटारी यांची सफाई मोहीम हाती घ्यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई व हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरातील झोन निहाय पथके स्थापन करण्यात आली असून ही पथके प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करतील, याची खातरजमा केली जावी. सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले.
लातूर व उदगीर शहरात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. शहरातील सांडपाणी वाहून नेणारे गटारे साफसफाई करावी. तसेच विद्युत खांब, रोहीत्रांची तातडीने करावी. वीज पडून गंभीर जखमी व मृत्युमुखी पडलेल्यांना व्यक्तींना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध द्यावी. तसेच अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव संगवी, आनंदवाडी, अहमदपूर रस्ता व पुलाचे काम त्वरित करण्याच्या सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या. लातूर शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने नाले, गटारी स्वच्छतेची मोहीम तातडीने हाती घ्यावी, असे आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही सूचना केल्या.