जळकोट : ओमकार सोनटक्के
गावातील भांडणतंटे गावातच मिटावेत, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागांत पुन्हा तंटे वाढले आहेत. अवैध व्यवसाय फोफावले आहेत. ग्रामीण परिसरात उद्भवणा-या भांडणाच्या निराकरणासाठी न्यायालयाचा आश्रय घ्यावा लागत असे. यात जमिनीची, राहत्या घराची हद्द, वाटणी यावरून होणारे वाद यात ग्रामीण जनतेचा वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. त्यामुळे ग्रामीण जनतेला अकारण त्रास सहन करावा लागत असे. पूर्वी हे वाद गावातील जाणती माणसे सोडवीत ती अगदी निपक्षपातीपणे याच धर्तीवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी गावातले तंटे गावात मिटावेत त्यासाठी तंटामुक्त गाव अभियान ही योजना सुरू केली . याला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला परंतु सध्या या समित्यांची कामे थंडावले असून गावामध्ये भांडण तंटे व वाद पुन्हा वाढू लागली आहे .
२००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास सुरवात केली. या अभियानाचा मुख्य उद्देश गावातून अवैध व्यवसायांचे उच्चाटन व्हावे, आपापसांत तडजोड होऊन भांडणे मिटावीत, ग्रामस्थांना कोर्ट-कचेरीच्या पाय-या चढाव्या लागू नये यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा कार्यकाळ वर्षभराचा ठरवून ग्रामसभेतून समितीची रचना करण्यात येते. यामध्ये गावातील प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता हा अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पदसिद्ध सदस्य, पोलिस पाटील, निमंत्रक, गावातील अन्य प्रभावी व्यक्ती, सदस्यांपैकी ५० टक्के महिला, अशी समितीची रचना असते. काही ठिकाणी या तंटामुक्त समितीने फार प्रभावी काम केले.
अगदी न्यायालयीन पातळीवर गेलेले तंटे मिटविण्यात या समितीला यश आले होते. या ठिकाणी काम करणा-या तरुणांनी प्रभावी काम केले. अनेक गावांना राज्य पातळीवरील बक्षीसेही मिळाली तर काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीतील पुनर्वसन हा एक कलमी कार्यक्रम राबविण्यात आला.