25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसंपादकीय विशेषतुतारी, मशाल, हात... ‘वंचित’ची घ्या साथ

तुतारी, मशाल, हात… ‘वंचित’ची घ्या साथ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. काही प्रसंग असे असतात की, सहज तोंडून शब्द येतात… ‘झाले ते बरेच झाले…’ चांगल्या गोष्टीसाठीच अगोदर खटकलेल्या घटना घडत असतात. पूर्वीच्या ‘घड्याळ’ चिन्हापेक्षा ‘तुतारी’ चिन्ह हे कितीतरी पटीने चांगले आहे. शिवाय मतदार आता खूप शहाणा झालेला आहे. २४ तासांत महाराष्ट्राच्या घराघरांत पवारसाहेबांच्या पक्षाचे नवे चिन्ह नुसतेच समजले नाही तर, चांगले निनादलेले आहे. ‘तुतारी’ फुंकणारा हा शेतकरी आहे. म्हणजे मावळा आहे. योग्य वेळी योग्य चिन्ह मिळाले.

दादांच्या गटाला पूर्वीचे ‘घड्याळ’ हे चिन्ह गेले हे बरे झाले. निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह दादांना दिले. पण, घड्याळाची चावी पवारसाहेबांच्या खिशात राहिली. त्यामुळे ते चिन्ह मिळाल्यापासून १०.१० च्या पुढे ते घड्याळ सरकलेच नव्हते. त्यामुळे बंद पडलेले घड्याळ निवडणूक आयोगाने दादांना देऊन टाकले. आता ते घड्याळ चालो न चालो… समजा चालले, तरी त्याचा गजर किती मोठा होणार? झाला तरी तुतारीच्या आवाजापुढे तो गजर ऐकू येणारच नाही. त्यामुळे सर्वच अर्थाने ‘तुतारी’ हे चिन्ह फारच लाभदायक ठरणार. ‘निवडणूक आयोग पक्षपाती आहे’ वगैरे आरोप रोज होत आहेत. जाहीरपणे होत आहेत… सर्वोच्च न्यायालयामुळे लोकशाही शिल्लक राहिली आहे, असेही देशात चित्र आहे. पण निवडणूक आयोगाला एक शाबासकी दिली पाहिजे… निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह रद्द केले. ते शिंदे गटाला दिले. आणि उद्धव ठाकरेसाहेबांच्या शिवसेना पक्षाला ‘मशाल’ चिन्ह दिले.

माझे व्यक्तिगत मत सांगतो… धनुष्यबाण हे चिन्ह तसे कालबा आहे. पूर्वीच्या काळी युद्धे धनुष्यबाणाने होत होती, त्याला पाच हजार वर्षे झाली. त्यामुळे कालबा चिन्ह आता शिंदे गटाकडे गेलेले आहे. त्यामानाने अंगावर येणारे असे म्हणता येईल हे ‘मशाल’ चिन्ह शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची एकूण राजकीय प्रकृती आणि चारित्र्य, मशाल या चिन्हात परिपूर्णरीतीने एकप्रकारे सामावलेले आहे. मशाल म्हणजे मेणबत्ती नव्हे. ‘मशाल’ या शब्दातच एक धाक, दरारा आणि तेज आहे. नेमकी तीच अवस्था ‘तुतारी’ या निशाणीची आहे. कोणत्याही मंगल समारंभात तुतारीवाला असल्याशिवाय मजा नाही. आता राहिला तो काँग्रेसचे चिन्ह ‘हात’… जेव्हा इंदिरा गांधींच्या पक्षाचे चिन्ह गोठवले गेले… तेव्हा इंदिरा काँग्रेस पक्षातही थोडी चिंता निर्माण झाली होती. पूर्वी पहिल्या निवडणुकीत म्हणजे १९५२ काँग्रेसची निशाणी ‘मानेवर जू असलेली बैलजोडी’ होती. पंडित नेहरू यांनी १९५२, १९५७, १९६२ या निवडणुका याच चिन्हावर जिंकल्या. १९६७ नंतर चिन्हांचे वाद सुरू झाले. इंदिरा गांधींना ‘गाय-वासरू’ चिन्ह मिळाले. त्या चिन्हावरही काँग्रेसने यश मिळवले. पुन्हा जेव्हा काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली तेव्हा हे चिन्ह गोठवण्यात आले.

आता नवीन चिन्ह कोणते? निवडणूक आयोगाने सुचविले की, ‘अपक्ष सदस्यांसाठी जी चिन्हे आहेत त्यातील एक चिन्ह निवडा…’ अपक्ष सदस्यांकरिता किती गमतीशीर चिन्हे होती… त्यात शिट्टी होती.. पाण्याचा बंब होता… धान्य दळायचे जाते होते… त्रिदल (तीन पाने) होते… पाण्याची बादली आणि एका कोप-यात बिचारा ‘हाताचा पंजा’ पडून होता… कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. इंदिरा गांधी यांनी वसंत साठे यांना चिन्ह शोधून आणायला पाठवले… इंदिराजी त्यांना ‘वसंत’ नावाने असे हाक मारत असत. आम्ही सगळे त्यांना ‘बापू’ म्हणायचो… त्यावरही विनोद व्हायचा… कारण महात्मा गांधी यांना ‘बापू’ म्हटले जायचे.. महात्माजींचा आश्रम वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामला… आणि वसंत साठे हे ‘बापू’ वर्धा जिल्ह्याचे खासदार… त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांची आम्ही काही मित्र गंमत करायचो… हे बापू आणि ते ‘बापू…’ … तर अशा या ‘बापू’ साठे यांनी कोप-यात पडलेला हात पाहिला… आणि अपक्षांना दिले जाणारे हे चिन्ह इंदिराजींना सुचविले. इंदिराजींनाही सुरुवातीला ते खटकत होते.

पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, नेता कोणत्याही पक्षाचा असो…. त्या पक्षाचे चिन्ह कोणतेही असो… सभेला व्यासपीठावर पोहोचल्यानंतर त्या-त्या पक्षाचे नेते समोरच्या श्रोत्यांना हाताचा पंजा उंचावूनच अभिवादन करतात… अगदी वाजपेयींपासून कोणीही… एका क्षणात ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह काँग्रेसने स्वीकारले आणि त्या हाताच्या पंजाने काय चमत्कार केला… हे देशाने पाहिले. आज काँग्रेस थोडी अडचणीत असली तरी ‘हात’ हे प्रभावी चिन्ह काँग्रेसजवळ आहे. आता पवारसाहेबांकडे ‘तुतारी’ आहे. उद्धवसाहेबांकडे ‘मशाल’ आहे… तिन्ही प्रभावी चिन्हे आहेत. राजकीय वातावरणातही ‘चिन्ह’ बदलल्याचे जाणवत आहे. त्यामुळे वातावरण चांगले आहे. देशभरात अनेक मार्गंानी भाजपाने हवा तयार करण्याचा प्रयत्न केला असला तरी महाराष्ट्र त्या हवेवर यावेळी मतदान करेल, असे अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रातील ‘हवा’ वेगळीच आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता आहे. तसे म्हटले तर महाराष्ट्र काँग्रेसला आज तगडा नेता नाही. नाना पटोले त्यांच्या परिने फिरत आहेत.

पण, सभा घुसळून काढणारा, नेता, वक्ता आज तरी काँग्रेसजवळ नाही. शिवाय नवीन को-या करकरीत चेह-याच्या उमेदवारांची नावे आणि त्यांची तयारी लगेच सुरू केली पाहिजे. लोकांना आता जुने चेहरे नको आहेत. भले पराभूत झाले तरी चालतील… पण नवीन चेहरे द्या… तरुण चेहरे द्या… आणखी एक महत्त्वाचे राजकीय पाऊल उचलावे लागेल… पवारसाहेबांनी, उद्धवसाहेबांनी आणि स्वत: खरगेसाहेब अशा तिघांनी एकत्र पुढाकार घेऊन, वंचित आघाडीला आपल्यासोबत आणले पाहिजे. त्यांना जागाही सोडल्या पाहिजेत. आणि सन्मानाने सोबत घेतले पाहिजे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी पडलेल्या उमेदवारांना सगळ्यात मोठा फटका, वंचित आघाडीच्या उमेदवाराने मते घेतल्याने झाल्यामुळे बसलेला आहे. अगदी ढळढळीत उदाहरण म्हणजे… सुशीलकुमार शिंदे… खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सुशीलकुमारांच्या विरोधात १,७०,०७ एवढी मते घेतल्यामुळे सुशीलकुमारांचा पराभव झाला. त्यांनी तो हसत-हसत पचवला… ते आजही काँग्रेससोबत ठाम आहेत. भाजपाने दिलेली सत्तेची ‘ऑफर’ त्यांनी ठामपणे धुडकावून लावली.

– मधुकर भावे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR