27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रधारावीतील तणावावरून विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

धारावीतील तणावावरून विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील धारावी येथे आज सकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. धारावीतील एका मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद सुरू झाला. हा भाग तोडण्यासाठी , कारवाईसाठी बीएमसी पथक तिथे गेले, मात्र स्थानिकांनी त्या पथकाला रोखले.
ही कारवाई रोखण्यासाठी जमावाने विरोध केला, तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केली.. याचदरम्यान विरोधकांनी या मुद्यावरून सरकारवर टीका केली असून गृहमंत्र्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी या मुद्यावरून सरकारला सुनावले.

मुंबईतील धारावी येथे शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता. . धारावीतील एका मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद सुरू झाला. त्यामुळे धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. गेल्या अनेक तासांपासून धारावीमध्ये तणावाचे वातावरण असून धारावी पोलिस ठाण्याबाहेरही जमावाने घेराव घालत न्याय देण्याची मागणी केली आहे. या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाजप सत्तेत आल्यावर वाचाळवीर तयार होतात : सुप्रिया सुळे

संपूर्ण महाराष्ट्रात सारख्या गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. रोज हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँगच्या बातम्या चॅनेल्सवर दिसतात. आणि आता धारावीत तणावपूर्ण वातावरण.. हे सातत्याने का होतंय? भाजप, त्यांचे सहकारी, पदाधिकारी, मित्र पक्ष विधान करत आहेत. भाजप सत्तेवर असल्यावरच वाचाळवीर या राज्यात कसे येतात? याचाही अभ्यास केला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

गृहमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालावे : संजय राऊत

धारावीतील तणावासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी त्वरित लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. धारावीतील सर्व पक्षीय प्रमुख लोक आयुक्तांना भेटले आहेत. नेत्यांना भेटले आहेत. यातून शांतपणे मार्ग काढावा लागेल, असे राऊत म्हणाले.

प्रशासन निर्णय घेईल : मंत्री उदय सामंत
तर सत्ताधा-यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्या प्रकारची माहिती घेतली पाहिजे. जर अनधिकृत बांधकाम असेल तर प्रशासन निर्णय घेईल, असे मंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.

शरिया कायदा लागू करायचा आहे : नितेश राणे
धारावीतील तणावपूर्ण परिस्थितीवरून भाजप नेते नितेश राणे यांनी चांगलंच सुनावलंय. या जिहादी मानसिकतेच्या लोकांना देशात, महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्यानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर महापालिका जेव्हा अतिक्रमण तोडायला आली तेव्हा तिथल्या जिहादींनी अतिक्रमण तोडायला दिलं नाही. उलट मुंबई महापालिकेची वाहने फोडली. ही अरेरावी आणि दादागिरी आहे, त्यांनी पाकिस्तानात आणि बांगलादेशात जाऊन दाखवावे, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. हा देश संविधानाप्रमाणेच चालणार आहे. या लोकांना जागेवर आणण्याचा आमच्याकडे कार्यक्रम आहे. कायद्याचे सर्वांनी पालन करावे. बेकायदेशीर काही होऊ देऊ नका. मुंबईतील परिस्थिती बिघडली तर त्याला जिहादी कारणीभूत असतील, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR