नाशिक : महाराष्ट्रात शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असताना नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरात पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत. नाशिक शहरात १० जानेवारी म्हणजेच आजपासून पुढचे १५ दिवस २४ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
या मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही. तसेच शहरात ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलिस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे. या दरम्यान विनापरवानगी मोर्चे आणि आंदोलन काढण्यास मनाई असणार आहे.
पोलिसांच्या मनाई आदेशानुसार १० जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत नाशिक शहरात स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई असणार आहे. पोलिसांच्या या मनाई आदेशामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण त्यामागील कारणही समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, शेतकरी आणि अन्य संघटनांकडून देण्यात आलेला आंदोलनाचा इशारा, तसेच मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.