स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभागरचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अ, ब, क वर्ग महानगरपालिकांची प्रभागरचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. यात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई, विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. राज्यात गत तीन-चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी प्रभागरचनेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभागरचना असेल. पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. मुंबईत २२७ प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन २३६ प्रभाग करण्यात आले. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा २२७ प्रभाग करण्यात आले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु आव्हान याचिका फेटाळण्यात आल्याने आता मुंबईमध्ये पुन्हा २२७ प्रभाग असणार आहेत. अ वर्ग महानगरपालिकांत पुणे, नागपूर; ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड ब वर्गात तर क वर्गात नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचा समावेश आहे. ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकांचा समावेश आहे. ड वर्गातील महापालिकेत प्रभागरचना ठरवताना शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत.
मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले. राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. गत तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आधी कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका खोळंबल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली. त्यानुसार राज्य सरकारने प्रभागरचनेचे आदेश दिले आहेत.
या आदेशांचे पालन करताना नगरविकास विभागाने अ, ब, क वर्ग १० महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत, तर ड वर्ग १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत. प्रभागरचनेसाठी साधारणपणे अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रभागरचना करताना महापालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभागरचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ यांची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त प्रारूप प्रभागरचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून प्रभागरचनेस मान्यता देण्यात येईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रभागरचना महापालिका आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर हरकती सूचना मागविण्यात येतील. यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचनेस मान्यता देण्यात येईल. प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करेपर्यंत ही प्रभागरचना गुप्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. राज्यात एकूण २९ महानगरपालिका, २४८ नगर परिषदा, १४७ नगरपंचायती आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभाग राहणार आहेत. नगरपालिका, नगरपंचायतीच्या प्रभागरचनेचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बार उडेल. सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार शक्यतो सर्व प्रभाग ४ सदस्यांचे असतील मात्र एखादा प्रभाग ३ सदस्यांचा आणि दुसरा ५ सदस्यांचा ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ३-३ सदस्यांचे दोन प्रभाग ठेवण्यासही परवानगी आहे. मात्र, भौगोलिक सलगपणा राखण्याचे आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभागरचनेची प्रक्रिया उत्तर दिशेपासून सुरू होऊन दक्षिण दिशेकडे पूर्ण केली जाईल. प्रभागाच्या सीमारेषा ठरवताना रस्ते, नद्या, रेल्वे लाईन तसेच नैसर्गिक सीमा लक्षात घेतल्या जातील. कोणतीही इमारत दोन प्रभागांमध्ये विभागली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल.