परभणी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आज सकाळपासूनच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांच्या भूमिकेवर आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आज सकाळी सहा वाजता मौजे शेंद्रा (जुना) येथील किशोर ढगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे, गोविंद गिरी यांनाही अटक करून मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ताडकळस येथील उमेश देशमुख यांना देखील सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धरपकड केवळ एकाच भागापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्हाभरात कार्यकर्त्यांवर करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी तयारीत होते. मात्र, या आधीच त्यांना ताब्यात घेतल्यामुळे सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट आहे. अनेक नागरिक विचारत आहेत की शेतक-यांच्या समस्या मांडणा-यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न का केला जात आहे?
आज जिल्ह्यात मान्सूनचा प्रवेश झाल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. मात्र, खतांचा तुटवडा भासत असून सर्की (कापूस) खताची बॅग ८२०/- रुपयांऐवजी १४००-१५००/- रुपयांना विकली जात आहे. त्याशिवाय, मुख्यमंत्री स्वत: म्हणतात की पीक कर्ज वाटप करताना बँकांनी सिबीलची अट लावू नये, तरीही बहुतांश बँका ही अट लावत असल्याने जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ५% शेतक-यांनाच पीक कर्ज मिळालं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री जिल्ह्यातील शेतक-यांच्या अडचणींवर काय निर्णय घेणार, आणि पोलिसांच्या कारवाईबाबत प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.