धाराशिव : (मच्छिंद्र कदम)
गेल्या २० वर्षांपासून धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पवन राजेनिंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल आज लागला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री, दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात आले आहे. डॉ. पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. जिल्ह्याच्या राजकारणातून आता हा मुद्दा गायब व्हायला हवा, मात्र तसे होणार किंवा नाही, हे नजीकच्या काळात दिसून येईल.
आमदार राणाजगजितसिंह पाटील हे राजकारणात फ्रंटफूटवर असतील तर ओमराजे यांना या मुद्द्यावर बॅकफूटवर खेलावे लागणार आहे. गेली १७ वर्षे आरोपांची राळ सहन केलेल्या डॉ. पाटील यांच्या कुटुंबियांची या प्रकरणातून एकदाची सुटका झाली आहे. न्यायासाठी गेली १७ वर्षे संघर्ष करणा-या, पवनराजे हत्याकांडाला आपल्या राजकारणाचा मुख्य मुद्दा बनवणा-या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची निराशा झाली आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवन राजेनिंबाळकर हे चुलत भाऊ. डॉ. पाटील हे राज्याच्या राजकारणात व्यग्र असताना त्यांनी जिल्ह्याची जबाबदारी पवनराजे यांच्यावर सोपवली होती. सुरुवातीच्या काळात पवनराजे हे पद्मसिंह पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. पद्मसिंह पाटील मंत्री असताना जिल्ह्यातील त्यांची राजकीय घडी बसवण्यात आणि स्थानिक पातळीवर त्यांचे व्यवस्थापन सांभाळण्यात पवनराजेंचा मोठा वाटा होता. जिल्हा बँक पवनराजेच सांभाळायचे. त्याच कालावधीत जिल्हा बँकेतील काही गैरव्यवहार समोर आले.
होम ट्रेड घोटाळाही समोर आला. त्यामुळे डॉ. पाटील यांची अडचण झाली. त्यातूनच डॉ. पाटील आणि पवनराजे यांच्यात वितुष्ट आले आणि पुढे २००४ मध्ये पवनराजे यांनी डॉ. पाटील यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत डॉ. पाटील यांचा निसटता विजय झाला. पुढे २००६ मध्ये पवनराजे यांची मुंबईत कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संशयाची सुई डॉ. पाटील यांच्याकडे वळली किंवा वळवण्यात तरी आली. याप्रकरणी डॉ. पाटील यांना अटकही झाली होती. तेव्हापासून पवनराजे यांच्या हत्येचा मुद्दा जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला.
तत्पूर्वी, डॉ, पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. ते राज्यमंत्रीही बनले होते. पवनराजे यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला. सहानुभूतीच्या लाटेवर त्यांनी २००९ च्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१४ मध्ये राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंचा पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही ओमराजे यांनी विजय मिळवला. या सर्व निवडणुकांमध्ये पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा मुद्दा कमी-अधिक प्रमाणात प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला.
डॉ. पाटील आणि पवनराजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्यानंतर स्थानिक राजकारणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद वाढतच गेले. हा वाद जिल्हा बँकेत पोहोचला. जिल्हा बँक आणि तेरणा कारखान्यावर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे एकछत्री अंमल होते. पवनराजे निंबाळकर यांनी या संस्थांमध्ये संचालक आणि पदाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी पद्मसिंह पाटील यांच्या कारभाराला थेट आव्हान दिले. जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहार, बोगस कर्जवाटपामुळे पाटील यांची अडचण झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मुतद्द्यांच्या आधारे डॉ. पाटील यांना घेरले. त्यामुळे डॉ. पाटील मंत्रिपद सोडावे लागले होते. याच राजकीय वैमनस्यातून पवनराजेंचा खून करण्यात आला, असा आरोप करण्यात आला. न्यायालयाने पुराव्यांअभावी तो निकाली काढला आहे.
पवनराजेंच्या हत्या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता, मात्र त्यात फारशी प्रगती होत नव्हती. डॉ. पाटील हे त्या काळात राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारमधील एक अत्यंत वजनदार नेते आणि माजी गृहमंत्री होते. त्यामुळे स्थानिक पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप निंबाळकर कुटुंबीयांनी केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने गुन्ह्याच्या दिवशी आणि त्यापूर्वी कळंबोली परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल क्रमांकांचे कॉल डेटा रेकॉर्ड्स तपासले.
यावरून शूटर्स आणि या कटातील मध्यस्थांचे थेट धागेदोरे उघड झाले. यात सीबीआयकडे शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांची नावे समोर आली. या शूटर्सचा संबंध मुंबईतील माजी नगरसेवक मोहन शुक्ला आणि पारसमल जैन यांच्याशी जोडण्यात आला. पारसमल जैन माफीचा साक्षीदार बनला. न्यायालयाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. या प्रकरणाचा पायाच ठिसूळ आहे, असे म्हणत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने तपासातील अनेक विसंगतींचाही उल्लेख केला आहे.
आता पुढे काय होणार?
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. १७ वर्षांनंतर अखेर आम्हाला न्याय मिळाला, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. आमची १७ वर्षे कशी परत मिळणार, बिनबुडाच्या आरोपांमुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांना मानसिक धक्का बसला, त्याची भरपाई कशी होणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पवनराजे यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. हे कलियुग आहे, चांगल्याला त्रास होतो, असेही ते म्हणाले आहे. एकंदर, पवनराजे हत्याकांडाचा मुद्दा आता जिल्ह्याच्या राजकारणातून निष्प्रभ ठरणार आहे. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात फ्रंटफूटवर खेळण्याची संधी मिळाली आहे. ओमराजे यांना मात्र या मुद्द्याच्या बाबतीत बॅकफूटवर जावे लागणार आहे.
















