मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज, तिस-या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यानंतर विधानसभेतील सभागृहातही विरोधक शेतकरी प्रश्नावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे विधान परिषदेत समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था आणि डीजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आज विधान परिषदेतील सभागृहात आवाज उठवला.
मुंबई पोलिसांचे वेळेअभावी आरोग्याकडे दुर्लक्ष : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसा-यापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्युटी आणि प्रवासात जातात. पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. तसेच पोलिसांचा प्रवासात वेळ जात असल्यामुळे योग आणि व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही.
आकडेवारीनुसार, पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली.
सरकारने ठोस पावले उचलावी
पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पोलिसांच्या शासकीय घरांची दुरवस्था झाली असून, मागील अनेक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाही. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.