मुंबई : चंद्रपूर परिसरातील औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा खाणी व स्टील उद्योगांमुळे निर्माण होणा-या प्रदूषणाच्या प्रश्नावर शासन जागरूक असून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. अर्धा तास चर्चेदरम्यान उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या की, चंद्रपूर परिसर २०१० मध्ये ‘क्रिटिकली पॉल्युटेड एरिया म्हणून नोंदवलेला होता, मात्र विविध उपायांमुळे प्रदूषण निर्देशांक ८३ वरून ५४ वर आला आहे. यामुळे काही उद्योगांना अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी उद्योगांना ईएसपी, डस्ट कलेक्टर, ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम, जलप्रदूषण नियंत्रणासाठी ट्रीटमेंट प्लांट, पाण्याचा पुनर्वापर, रस्त्यांचे पक्कीकरण व फवारणीसारख्या अटी बंधनकारक करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.