लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांना विनाअट सरसगट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि हक्काचा पीकविमा मिळाला पाहिजे या मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास समर्थन देत लातुरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी शासनाच्या फसव्या कर्जमुक्तीच्या शासनादेशाची होळी करण्यात आली.
राज्य सरकारने नुकताच कर्जमुक्तीचा शासनादेश काढला असून त्यात अनेक जाचक अटी व शर्थी घालण्यात आलेल्या असल्याने शेतक-यांची घोर फसवणूक केलेली आहे. शेतक-यांना याचा कसलाच फायदा होणार नाही. उद्योगपतीचे लाखों कोटींचे कर्ज विना अट माफ केलं जात असताना शेतक-यांना मात्र जाचक अटी घालून उध्वस्त करायचं काम सरकार कडून सुरु आहे. जाती जातीत भांडण, धर्मा धर्मात भांडण लावून शेतक-यांच्या प्रश्नावर एकत्र येऊ देऊ नये असा डाव सरकार खेळत आहे.पीकविमा नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. याचे सरकारला काहीही देणे घेणे राहिलेले नाही.
रविकांत तुपकर बेमुदत अन्न त्याग आंदोलनास बसलेले असून त्यांच्या जीविताचे बरे वाईट होण्याची वाट सरकार बघत आहे की, काय असा सवाल सुद्धा महाराष्ट्रतील जनता करीत आहे. संघटना फोडाफोडी पक्ष फोडा फोडी, असे अनेक प्रयोग करुन त्यात सरकार यशस्वी झाले आहे. परंतु शेतकरी कष्टकरी एकजूट होऊन सरकारचे मनसुबे उधळून लावतील. आता लढाई आरपारची असेल, शेतक-याच्या नादाला सरकारने लागू नये, असा इशारा आंदोलकांनी देत तात्काळ सरसगट विना अट कर्जमुक्ती करुन हक्काचा पीकविमा द्यावा आणि रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा गणिमी काव्याने राज्यात काही ही घडेल याची जबाबदारी सरकारवर असेल.
या आंदोलनात राजीव कसबे, सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, नवनाथ शिंदे, प्रज्योत हुडे, शाम जाधव, सतीश राठोड, इमाम सय्यद, विशाल ढोबळे, बालाजी सूर्यवंशी, गौतम कांबळे, दत्ता किणीकर, आदेश कसबे, बालाजी हौळ पाटील, मारुती कसबे धनराज घुटे, सावन गवळी, शिवाजी कसबे, प्रवीण गायकवाड,सतीश चोरमले, एम. एम. जगताप, बबलू शेख, आकाश घुटलकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
















