मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस’ विजेता गौरव खन्ना आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत आकांक्षा चमोलाने स्वत:च त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. ‘लॉक अप सीझन २’ च्या प्रीमियरमध्ये तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
शोमध्ये स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील एक मोठे गुपित सांगण्यास सांगितले असता, आकांक्षाने सांगितले, मी आणि गौरव घटस्फोट घेत आहोत. आम्ही गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहोत. मात्र ही गोष्ट आजपर्यंत कोणाला सांगितली नव्हती. तिच्या या वक्तव्यानंतर शोच्या होस्टसह सगळेच काही काळ अवाक् झाले.
आकांक्षाने पुढे स्पष्ट केले की, आमचे आजही बोलणे होते. आम्ही एकमेकांचा आदर करतो. मात्र पती-पत्नी म्हणून आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही, हे आम्हा दोघांनाही जाणवले. आमचे भविष्यासंदर्भातील विचार पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आम्ही निर्णय घेतला, असे ती म्हणाली.
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघांची जोडी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच सोशल मीडियावरही दोघे एकत्र दिसायचे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा चाहत्यांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. काही महिन्यांपूर्वी या अफवा खोट्या असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र आता आकांक्षाने स्वत:च सत्य समोर आणल्याने सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, गौरव खन्नाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आकांक्षाने सांगितल्याप्रमाणे, दोघांनी कोणत्याही वादाशिवाय आणि एकमेकांविषयी आदर कायम ठेवत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
















