23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूर‘मांजरा’ परिवाराने शेतक-यांना शाश्वत आधार दिला

‘मांजरा’ परिवाराने शेतक-यांना शाश्वत आधार दिला

लातूर : प्रतिनिधी
चार दशकापूर्वी चिंचोलीरावच्या माळरानावर मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. लोकनेते विलासराव देशमुख, स्व. बब्रुवान काळे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्या सहका-यांनी लावलेल्या या रोपटयामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलली. शेतक-यांना शाश्वत आधार देणे, रोजगार निर्माण करणे यामुळे आपले शेतक-यांचे जीवनमान उंचावले. हा शाश्वत विकास कायम राहावा, यासाठी शेतक-यांनी नेहमीच आम्हाला खंबीर साथ दिली. ती साथ पुढेही कायम राहील, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील चिंचोलिराव येथील खंडेराव सप्ताळ यांच्या निवासस्थानी  दि. ३० ऑगस्ट  रोजी महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना आमदार धिरज देशमुख बोलत होते. या वेळी प्रमुख पाहूण्या म्हणून विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख, रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनिता अरळीकर, अमर पांडे, डॉ. हनुमंत किणीकर, डॉ. कल्पना किणीकर, पांडुरंग पाटील, खंडेराव सप्ताळ, सादीक पटेल, साहेबराव पांढरे, वैशाली दरेकर, फातेमा गुडवाले, सुमनबाई बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार धिरज देशमुख म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवाराच्या चांगल्या कामगिरीमुळे शेतक-यांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण झाले. मांजरा परिवाराच्या माध्यमातून  प्रतिवर्ष हजार ते बाराशे कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. काँग्रेस व महाविकास आघाडीला मराठवाडयात चांगले दिवस येत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. लातूरमध्ये १० वर्षानंतर काँग्रेसचा खासदार निवडून आणला. आपल्या अपेक्षेप्रमाणे ते काम करीत आहेत. आता येणा-या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व महाविकास आघाडीला जास्तीत जास्त ताकद द्यावी. महाविकास आघाडी सरकारचे काम जनतेनी कोरोना आपत्तीत अनुभवले आहे, पाहिले आहे.
जनतेला अपेक्षित काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. या कामाची त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. कारण ती सरकारची जबाबदारी आहे. आताचे सरकार जाहिरातबाजीचे सरकार आहे. वेगवेगळया योजना आखून इकडचा निधी तिकडे वळवला जात आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान, शालेय गणवेश, पोषण आहार, आरोग्य सुविधा यासाठी शासनाकडे निधी नाही, असे अनेक प्रश्न आहेत. मुख्­यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिवस-रात्र परिश्रम घेऊन अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी काम करीत आहेत. मात्र, त्यांना शासनाकडून प्रति लाभार्थी ५० रुपये देय  प्रोत्साहन रक्कम अद्यापही मिळाली नाही.
भाजपने महाराष्ट्रातील अनेक उद्योग प्रकल्प बाजूच्या राज्यात नेले. त्यामुळे आपल्या मुलाबाळांचा रोजगार हिरावला. या सरकारमुळे महाराष्ट्राची अधोगती होत आहे. महाराष्ट्राला पुन्हा एक नंबर करायचे असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे लागेल. आपल्या विचाराचे सरकार नसले तरी आपल्या विचाराच्या संस्थांत लोकहिताचे निर्णय घेतले जातात. लातूर जिल्हा बँकेने महिला भगिनींसाठी झिरो बॅलन्सवर २५ ते ३० हजारांपेक्षा अधिक खाते काढून दिले. तसेच महिलांसाठी मिनिमम बॅलन्स ही अटही शिथिल करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री अमित देशमुख पालकमंत्री असताना शेतक-यांना नुकसानीचे १२१ कोटींचे पॅकेज मिळाले. येणा-या काळात आपल्या विचाराचे सरकार आणायचे आहे, यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहनही आमदार धिरज देशमुख यांनी केले. यावेळी रीड लातूरच्या संस्थापिका सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनीही महिलांशी संवाद साधला.
यावेळी पारुबाई जाधव, इंदुबाई चंद्रकातले, गौळणबाई घोडके, यारुबाई जाधव, खातूनबी तांबोळी, छबीता घोडके, सुनिताबाई केसवे, सुननबाई बंडगर, अनुसया बनसुडे, जयश्री गवळी, रेखाबाई घोडके, मिजास तांबोळी, सुनिता सुलगुले यासह महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर गोपाळ दरेकर, बाबूराव अंबुवाने, बाबू शिवगुले, शिवाजी दरेकर, तेजु जाधव, बाबासाहेब पांडरे, समिउला पटेल, बाबूराव मेळे, कल्याणराव दरेकर, विठ्ठल केसवे, विनोद गवळी, सालार गुडवाले, देवकुमार पांडरे, वजिर पटेल आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR