शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन
अमरावती : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या आंदोलनस्थळी आहेत. त्यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, सरकारच्या वतीने अद्याप मध्यस्थी केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते अमरावती शहरात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीदेखील बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथील उपोषणस्थळी जमा होत आहेत. त्यामुळे आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आज बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीत जरांगे यांनी कडू यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात, असे म्हटले.
तोपर्यंत अन्नाचा
कण खाणार नाही
जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. काहीही झाले तरी मी अन्नाचा कण खाणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या भूमिकेमुळे १० जून रोजी २ किलो वजन कमी झाले. आज तर त्यांची प्रकृती खालावली. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.