छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. विहिरीच्या कामादरम्यान ढिगा-याखाली दबून वडील आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारात विहिरीचे काम सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे. बाजीराव सर्जेराव काकडे (५५ वर्षे), आजिनाथ बाजीराव काकडे (२५ वर्षे) आणि शाम बाजीराव काकडे (२२ वर्षे) अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. ही घटना ९ मे रोजी रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. नवरा आणि दोन मुलांच्या मृत्यूमुळे बाजीराव काकडे यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
विहिरीचे काम सुरू असताना रात्री विहिरीत पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी तिघेही बाप-लेक विहिरीच्या काठावर उभे होते. मात्र माती असल्याने विहीर ढासळली त्यामुळे तिघेही विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्यामुळे तिघेही ढिगा-याखाली दबले. त्यांना स्वत:चा जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

