मुुंबई : प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वा-यांचा देशातून परतीचा प्रवास शनिवारी पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला. यंदा तो दोन दिवस उशिराने परतत असून, ३-४ दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून माघार घेईल.
अंदमानमधील हवामान प्रणाली २३ सप्टेंबरपर्यंत तीव्र होऊन ओडिशा-आंध्र किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारत व पूर्व किनारपट्टीवर २५ सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील. ओडिशा आणि आंध्र किनारपट्टीला २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, बंगालसह ईशान्येकडील राज्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही रविवारी सर्वत्र वादळी वा-यांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सप्टेंबर महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने वातावरणातील आर्द्रता घटून उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे सलग सहाव्या दिवशी शहराचे कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे राहिले.
यंदा थंडीचीही ओढ राहणार
‘‘वाढत्या एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात हे मोठे बदल दिसत आहेत. नेहमी हमखास परतीचा पाऊस मिळणा-या मराठवाड्यात यंदा तुलनेत पाऊस कमी राहील तसेच आगामी मोसमात थंडीचा कडाकाही कमीच असण्याची शक्यता आहे.
जालन्यात ५ दिवस पावसाची शक्यता
जालना जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेली उघडीप आता संपण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जिल्ह्यात पावसाची शक्यत असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात दोन वेळा तुरळक पाऊस झाला. मात्र, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे दीर्घकाळापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतक-यांच्या नजरा आता पुढील पाच दिवसांच्या हवामानाकडे लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सियसच्या आसपास आहे.
















