मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात पुढच्या तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या असतात. कारण या निवडणुका म्हणजे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. कार्यकर्ते घडवण्याबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी भक्कम करता येते. म्हणून या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वांत जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असून या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेले असते. यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे. दोन्ही ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण दोन्ही ठाकरेंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले होते. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनीती आखली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात झाली आहे.
उपनेत्यांवर जबाबदारी
‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. उपनेत्यांनी मतदारसंघात जाऊन आढावा बैठका, माजी नगरसेवक, शाखाप्रमुख इतर पदाधिका-यांशी चर्चा करायची आहे. काल राज्य सरकारच्या वतीने प्रभागासंदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीने पालिकेची तयारी केली जात आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ वॉर्ड आहेत.