परभणी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरुवारी परभणीतील दौ-याच्या सुरुवातीस हेलीपॅडवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वागताची धुरा सांभाळली. मुख्यमंत्री थेट कृषि विद्यापीठाच्या कार्यक्रमाकडे रवाना झाले, मात्र त्यांच्या गाडीत कोण होते आणि कोण नव्हते, याकडे अनेकांचे लक्ष लागले.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वाहनात पालकमंत्री मेघना बोर्डीकर, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यमंत्री संजय जयस्वाल हे होते. परंतु, भाजपाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना त्यात जागा मिळाली नाही. पक्षाचे स्थानिक नेतृत्व, जिल्हा व महानगर अध्यक्ष अनुक्रमे संतोष मुरकुटे आणि शिवाजी भरोसे यांच्याकडे केवळ स्टेजवर फोटोसाठी जागा होती.
मुख्यमंत्र्यांच्या गाडीत मात्र मंत्र्यांना प्राधान्य
गाडीत जागा नाही, मग पक्षात जागा आहे का? हा प्रसंग काहीसा राजकीय संकेत देणारा ठरला. पक्षाचे जिल्हा नेतृत्व बगलमध्ये राहते आणि राज्यातील मंत्री सोबत गाडीत असतात, तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज होणे स्वाभाविकच होते.
यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांची उपस्थितीही कार्यक्रमाच्या शासकीय दर्जावर शिक्कामोर्तब करणारी होती. मात्र, स्थानिक भाजप पदाधिका-यांचा उत्साह अपेक्षेपेक्षा कमी वाटला.
सत्ता गाडीत बसते, पण संघटना मागे राहतात का?
हा दौरा ‘धन्यवाद सभा’ म्हणून जाहीर झाला असला तरी, त्याच दौ-यात भाजपच्या जिल्हाध्यक्षांना गाडीत संधी न मिळाल्याने, हा खरंच ‘धन्यवाद’ होता की ‘संकेत’, असा प्रश्न उपस्थित होतो.