24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यभरात पावसाचा जोर वाढला

राज्यभरात पावसाचा जोर वाढला

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वा-यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात कोसळणा-या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वसई, विरार, नालासोपारा यांसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरसह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतक-यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारची सुटी असल्याने तरुण वर्ग तसेच पर्यटकांनी चौपाटीला पसंती दिली. फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलिबॉल खेळण्यासाठी तरुण वर्गाची मोठी गर्दी झाली होती, जिथे पावसाचा आनंद आणि खेळाचा अनुभव घेण्यासाठी नागरिक जमले होते.

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणाच्या सांडव्यावरून ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण ७२ टक्के भरल्याने आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाण्याची मोठी आवक होत आहे. हा विसर्ग १५ जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवारची सुटी असल्याने धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात संततधार पावसामुळे छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात हिरवळीचे साम्राज्य पसरले असून, निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यासह घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आणि शेतक-यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR