परभणी : शेतीसाठी दिवसा वीज मिळत नसल्याने शेतक-यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यात मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील शेतक-यांना शेतीसाठी ३६५ दिवस दिवसा वीज पुरवण्याचा संकल्प महायुती सरकारने केला असल्याची ग्वाही गुरूवार, दि. २९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
परभणी शहरातील स्टेडीयम मैदानावर गुरूवारी भाजपच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, भाजप प्रदेश सचिव किरण पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, खा. अजित गोपछडे, आ. संजय केणेकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजप उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, डॉ. विद्या चौधरी, विलास बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करत अवघ्या २३ मिनिटांत दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैनिकांचा हा विजय कौतूकास्पद आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी हा नवीन भारत असल्याचे संपूर्ण जगभराला दाखवून दिले. विरोधक सर्जीकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक तसेच ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहीमांवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत. परंतू नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेचे लाइव्ह चित्रण दाखवण्यात आल्याने विरोधकांना प्रश्न चिन्ह निर्माण करण्यासाठी जागाच उरली नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जुन नमूद केले.
या सभेचे प्रास्ताविक भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी केले. या सभेला संपूर्ण जिल्हाभरातून नागरिकांसह लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेच्या यशस्वितेसाठी भाजपा पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शेतक-यांच्या आर्थिक विकासाला प्राधान्य
मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील शेतक-यांच्या आर्थिक विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत वर्ल्ड बँकेच्या मदतीने शेतमालासाठी बाजारपेठ व भांडारगृह प्रोजेक्ट राबवण्यात येणार असून यामुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक सक्षमता येऊन त्यांचा विकास होईल. १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाद्वारे ४८ विभागातील ९०० पैकी ७५० मुद्दे मार्गी लावत महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांनी हा टास्क यशस्वीपणे पूर्ण केला असून आता १५० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
परकीय गुंतवणुकीत राज्य अव्वल
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सध्या क्रमांक एकवर आहे. एकुण गुंतवणुकीच्या जवळपास ४० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची घौडदौड आता कुणीही थांबवू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.