अयोध्या : वृत्तसंस्था
अयोध्येत २२ जानेवारीला होणा-या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ््याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ््याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच आता राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत राहणा-या लोकांनाही शहरात प्रवेश घेताना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. एवढेच नाही तर मंदिराच्या सुरक्षेसाठी ३ स्तरावरील सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
अयोध्येतील या भव्य दिव्य सोहळ््याचे आमंत्रण अनेक दिग्गजांना देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांकडून सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
मंदिराच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि पीएसी तैनात करण्यात आले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिरिक्त सैनिक तैनात केले आहे. याशिवाय एआय, सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवली जाणार आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपही अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था पाहत आहेत. तसेच उत्तर प्रदेश पोलिस आणि पीएसीचे १४०० अधिकारी मंदिर परिसराच्या बाहेर रेड झोनमध्ये तैनात असतील.
अयोध्येची सीमा सील
शनिवारपासून (२० जानेवारी) अयोध्येची सीमा सील करण्यात आली असून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने कालपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. अमेठी, सुलतानपूर, गोंडा, लखनौ, बस्ती येथून अयोध्येच्या दिशेने येणा-या गाड्या वेगवेगळ््या मार्गाने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे.