पुणे : प्रतिनिधी
एकविसाव्या शतकात शिक्षणाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. शिक्षण आता केवळ विद्यापीठे, प्रयोगशाळा, पदवी घेण्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे एक साधन बनले आहे. त्यामुळे, विकसित भारत@२०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रात राष्ट्रासमोर असणा-या समस्या सोडविण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे, असे भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. डॉ. अभय करंदीकर यांनी सांगितले.
एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ १०व्या विद्यारंभ-२५ कार्यक्रमात ते बोलत होते. एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, संचालक उपस्थित होते.
डॉ. करंदीकर म्हणाले, विद्यापीठाच्या १५०+ एकरांच्या सुसज्ज अशा या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रेया, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यांसारखे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात व त्यातून सध्या ७५+ संशोधन प्रकल्प चालू असल्याचे पाहून आनंद झाला. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश एस. यांनी तर आभार डॉ. दुबे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघटकर व डॉ. अशोक घुगे यांनी केले.