नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. आता आरक्षित तिकिटाची प्रतीक्षा यादीचा तक्ता लवकरच समोर येणार आहे. रेल्वे प्रवाशांची रिझर्व्हेशन यादी आता २४ तासांपूर्वी तयार होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. रेल्वे प्रवासात पारदर्शकता आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. नव्या नियोजनामुळे प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही. उलट त्यांना २४ तास अगोदरच त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नव्या नियमावलीनुसार आता रेल्वेची कन्फर्म तिकीट यादी आणि त्याविषयीचा तक्ता अगोदरच म्हणजेच २४ तास अगोदर जाहीर होणार आहे. याविषयीचे पाऊल ६ जून रोजी टाकण्यात आले. बिकानेर भागातील ट्रेन प्रवासासाठी हा प्रयोग राबवण्यात आला. रेल्वेच्या सूत्रांनुसार सुरुवातीच्या ४ दिवसांत या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. तिकीट कन्फर्म आहे की नाही, हे आता २४ तास अगोदरच समजणार असल्याने आता गैरसोय दूर होणार आहे. अर्थात, जर तिकीट कन्फर्म नसेल तर ते दुस-या साधनांचा वापर करण्यास मोकळे होतात. ते त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकतात. या प्रयोगामुळे त्यांची वेळेवर होणारी फटफजिती टळणार आहे.
बिकानेरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याने देशातील इतर गर्दीच्या मार्गिकेवर हा प्रयोग लागू करण्यात येणार आहे. रेल्वे वाहतुकीचे जे मार्ग अधिक गर्दीचे आहेत, तिथे हा प्रयोग राबण्यात येईल. यामध्ये दिल्ली ते उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या अनेक राज्यांतील रेल्वे मार्गांचा समावेश आहे. या राज्यातील अनेक मार्गांवर रेल्वे प्रवाशांना प्रतीक्षा यादीची समस्या, अडचण नेहमी भेडसावते. त्यांचे तिकीट वेळेवर कन्फर्म होत नाही. त्यामुळे त्यांना प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने नव्या नियमावलीचा रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.
…तर अतिरिक्त डबा जोडता येणार
कन्फर्म तिकिटाची यादी तयार करण्यासोबतच अजून एक प्रयोग करण्याचा रेल्वे विभागाचा मानस आहे. त्यानुसार जर २४ तासांपूर्वी प्रतीक्षा यादी तयार होत असेल आणि प्रवाशांचा आकडा अधिक असेल तर स्थानिक प्रशासन त्या रेल्वेला अतिरिक्त डबा जोडू शकते. याविषयीचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांसमोर अधिका-यांनी ठेवला होता. त्याला त्यांनी तात्काळ मंजुरी दिली. त्यामुळे प्रवाशांना जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तात्काळ तिकिटासाठी
आता ओटीपी आवश्यक
भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल केला असून, १ जुलै २०२५ पासून आधार प्रमाणिकरणाशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग बंद करण्याचा निर्णय तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. अर्थात आपले आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक नसेल तर १ जुलैपासून आपल्याला तात्काळ तिकिटे बुक करता येणार नाहीत.