मुंबई : प्रतिनिधी
यंदा दिवाळी सणासाठी शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याऐवजी बाजारापेक्षा कमी दरात साखर, डाळ व खाद्यतेल वाटप करण्याची योजना महायुती सरकारकडून आखली जात आहे. यासाठी आसाम सरकारने राबवलेल्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास महाराष्ट्रात सुरू असून येत्या दिवाळी सणापर्यंत यावर आंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यात महायुती सरकारने गेल्या २-३ वर्षांत सरकारने आनंदाचा शिधा योजनेतून १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चणा डाळ, १ किलो खाद्यतेल दिले होते. आता या सर्व पदार्थांचे भाव वाढले आहेत. साखरच ५५ ते ६० रुपये किलो झाली आहे. म्हणून तीन पदार्थ बाजारापेक्षा स्वस्त दरात देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अर्थात स्वस्त किंवा कमी दर म्हणजे बाजारापेक्षा किती स्वस्तात पदार्थ वाटप होतील, हे अद्याप ठरलेले नाही.आसाममध्ये डाळ, साखर आणि मीठ अनुदानित दरात दिल्या जातात. याचा अभ्यास करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विभागीय स्तरावर काम सुरू झाले आहे. ही योजना दिवाळीसाठी महाराष्ट्रात कशी लागू करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे.
१ शिधापत्रिकाधारक म्हणजे दारिर्द्यरेषेवरील परंतु निम्न मध्यमवर्गीय कुटुंब आहे. २ ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. १५,००० ते रु. १,००,००० रुपयापर्यंत आहे, त्यांना केशरी शिधापत्रिका मिळते. 3 कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी नसेल किंवा बागायती जमीन निश्चित मर्यादेपेक्षा जास्त नसेल त्यांना केशरी शिधापत्रिका मिळते. ४ या शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या निकषांनुसार सवलतीच्या दरात काही ठराविक अन्नधान्याचा लाभ मिळतो. ५ महाराष्ट्रात सुमारे १ कोटी ८४ लाख २४ हजार केशरी शिधापत्रिकाधारक असल्याची नोंद.
















