23 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeपरभणीवनामकृविची सर्वांगिण विकासात यशस्वी घोडदौड

वनामकृविची सर्वांगिण विकासात यशस्वी घोडदौड

कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांच्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ आज दि.२५ जुलै रोजी पूर्ण केला. शेतकरी देवो भव: या तत्त्वाशी बांधिल राहून त्यांनी शेतकरी, विद्यार्थी-केंद्रीत शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन तसेच कर्मचारी-केंद्रित प्रशासनाच्या कार्यपद्धतीद्वारे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास घडवून आणला. या निमित्ताने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीने एक विशेष बैठक कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाच्या सर्व संचालनालये, महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांच्या वतीने कुलगुरूंंचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, सर्व अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, हे माझ्या कर्तव्याचेच प्रतिबिंब आहे.

माझ्या वडिलांनी नेहमीच जबाबदारीचे भान शिकवले. प्रत्येकाने आपला स्वभाव चांगला बनवावा. कार्य करत असताना लोक आपल्यावर प्रेम करतात, पण आपण त्या पदावरून गेल्यानंतर लोकांनी अधिक प्रेम करावे, असे व्यक्तिमत्त्व आपण घडवले पाहिजे. त्यासाठी पदाच्या जबाबदा-या समजून घेत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. संकटे येत राहणारच, पण त्यावर मात करत आपली दिशा योग्य ठेवावी. संधी आल्यावर ती ओळखून तिचे सोने करावे. आपण ध्येयवेडे होऊन काम केले पाहिजे. याच कार्यपद्धतीची फलश्रुती म्हणजे विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ए ग्रेड मानांकनासह अधिस्‍वीकृती तसेच राष्ट्रीय पातळीवर रु ६५ कोटींच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे.

आपल्याला सर्वसाधारण व्यक्तींपासून विशेष बनवण्याचे कार्य विद्यापीठ करते. त्यामुळे विद्यापीठाला योग्य स्थान व महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी सर्वांना आपण एकमेकांबद्दल सहकार्याची आणि आपुलकीची भावना ठेवावी, द्वेष आणि मत्सर बाजूला ठेवावा, नैतिक मूल्ये जपावीत आणि आपले व्यक्तिमत्त्व उत्तम बनवावे असे आवाहन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे अनेक अधिकारी उत्तम नेतृत्वक्षम व्यक्ती म्हणून घडले असून विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. अ‍ॅग्रीटेलसारख्या संस्थेच्या रँकिंगमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या दहामध्ये तर इतर अनेक रँकिंगमध्ये पहिल्या ३० क्रमांकात स्थान मिळवले असल्याचे सांगितले.
कुलसचिव संतोष वेणीकर यांनी सांगितले की, प्रशासकीय कार्यामध्ये कुलगुरू यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत असून, त्यांच्या कार्यकाळात अधिकारी आणि कर्मचा-यांना लाभ देणारी अनेक महत्त्वपूर्ण कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगितले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नमूद केले की, कुलगुरूंच्या नेतृत्वाने रु. ६५ कोटींच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली असून, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना मान्यता मिळाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, त्यांनी २५०० एकर जमीन वहीतीखाली आणण्यात यश मिळवले असून, बीज उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या विद्यापीठाला प्राधान्याने मंजूर होत असल्याचे नमूद केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी कुलगुरूंनी सर्वांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. डॉ. प्रवीण वैद्य यांनी कुलगुरू कामाला प्राधान्य देतात व यशाची अपेक्षा न करता ते ईश्वरावर सोडतात, असे सांगितले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी कुलगुरूंनी पदभार स्वीकारल्यापासून विद्यापीठाचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सुमारे एक हजार दिवसांच्या कार्यकाळात ५०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ अधिकारी विद्यापीठाला भेट देण्यासाठी आले असेल्याचे आवर्जून सांगितले.

विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे, शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे डॉ. गोदावरी पवार आणि डॉ. अनंत लाड यांनीही कुलगुरूंच्या कार्याची माहिती दिली. विद्यार्थिनी उन्नती चव्हाण यांनी कुलगुरू सर्वच कार्यक्रमात सक्रीय सहभागी होतात. त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळते. त्यांच्याशी संपर्क करताना कधीही दडपण जाणवत नसल्याचे नमूद केले.
सूत्रसंचालन आणि आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या संवाद सत्राला विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR