सातारा: राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. भाजपने या जागेसाठी धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी शिवसेनेने अद्याप आपला पाठिंबा स्पष्ट केलेला नाही. जुन्या राजकीय संघर्षाची सल मनात असल्याने महायुतीतील हा पेच अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“तुम्ही बैठकीला येत नाही, मग आम्हालाही विचार करावाच लागेल”
विधानपरिषद निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या महत्त्वपूर्ण समन्वय बैठकीला मंत्री शंभुराज देसाई अनुपस्थित होते. या अनुपस्थितीबाबत विचारले असता, त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर आणि कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
देसाई यांनी भाजपला सुनावताना म्हटले
“पालकमंत्री म्हणून यापूर्वी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी मी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. एकीकडे पालकमंत्री प्रयत्न करत असताना तुम्ही बैठकीला येत नाही आणि दुसरीकडे थेट स्वबळावर लढण्याची घोषणा करता. मग अशा परिस्थितीत आम्हालाही आमचा विचार करावा लागणारच!”
आधी स्थानिक सदस्यांचे मत जाणून घेणार
शिवसेना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्या जातील, असे देसाई यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून, आता पक्षाच्या सर्व नगरसेवकांची, जिल्हा परिषद सदस्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातील सल आणि भूमिका समजून घेतली जाईल. त्यानंतर तयार केलेला अहवाल मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवला जाईल आणि वरिष्ठ नेतेच यावर अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
महायुतीसमोर नवा पेच; निवडणुका ठरणार प्रतिष्ठेच्या
सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिक आणि सातारा-सांगली या दोन विधानपरिषद मतदारसंघांतील निवडणुकांकडे लागले आहे. सातारा-सांगलीमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या काळातील जुना राजकीय संघर्ष शिवसेना नेत्यांच्या मनात अजूनही कायम आहे. त्यामुळे शिवसेना येथे भाजपच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी राहते की मतदानातून आपली नाराजी दाखवून देते, यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. शंभूराज देसाई यांच्या या रोखठोक इशाऱ्यामुळे सातारा-सांगलीची ही निवडणूक केवळ भाजप आणि विरोधकांमधील लढत न राहता, महायुतीच्या अंतर्गत ऐक्याची आणि नाराजीची मोठी परीक्षा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
















