वर्धा : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर विरूल इंटरचेंजजवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.
प्राथमिक माहितीनुसार, आयशर ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आयशर ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ट्रकमधील क्लिनर अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
तर या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मृतदेह पुलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या भीषण अपघाताचा पुढील तपास पुलगाव पोलिस करत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, मागील २९ जून रोजीही असाच एक अपघात अमरावती येथे घडला होता. चंद्रपूरकडून अकोल्याकडे जात असताना उभ्या कंटेनरला कार मागून धडकल्याने त्यामधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. देशातील सर्वांत आधुनिक आणि वेगवान महामार्गांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गावर वेगाइतकाच वाहनधारकांचा निष्काळजीपणाही वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यात महामार्गाच्या कडेला बिनधास्त उभे केलेले ट्रक, कंटेनर आणि कार हेच आता भरधाव वाहनांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहेत.
















