सोलापूर-सोलापूर शहराला रविवारपासून (१२ मे) सरसकट पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनी दिली.
सोलापूर शहरात तापमानात वाढ होत आहे. त्याचबरोबर उजनी जलाशयातील पाणी पातळी ही वरचेवर घटत आहे.
उजनी जलाशयातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा होतो.यापूर्वीच पाणी पातळी घटल्याने दुबार पंपिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गुरुवारी उजनीतील पाणीपातळी वजा ४३ टक्के होती. साधारणतः वजा ५२ टक्के पाणीपातळी झाल्यानंतर तिबार पंपिंगची यंत्रणा सुरू करावी लागते. या तिबार पंपिंग साठी आवश्यक
साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान, उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात येत असलेले पाणी २० जुलै २०२४ पर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापूर शहराला रविवार दि. १२ मे २०२४ पासून सरसकट सर्व भागांमध्ये पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा.
महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे.
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी २० मे २०२४ दरम्यान पोहोचणार आहे. हे पाणी सोलापूर शहरासाठी २० जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे.