लातूर (प्रतिनिधी): येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील सुमित कोचेटा यांच्या मालकीच्या स्क्रॅप मर्चंटला काल (८ जून) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, पत्र्यांच्या २ ते ३ मोठ्या गोडावूनमधील रद्दी कागद, पुठ्ठा आणि इतर स्क्रॅपचे साहित्य काही वेळातच जळून खाक झाले. लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासह खासगी साखर कारखान्यांच्या यंत्रणांनी रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
जुन्या एमआयडीसी भागात सुमित कोचेटा यांचे मोठे स्क्रॅप मर्चंट (भंगार दुकान व गोडावून) आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रद्दी पेपर, कागद आणि पुठ्ठा गोळा करून त्यावर रिसायकलिंगची (पुनर्प्रक्रिया) प्रक्रिया केली जाते. दररोजप्रमाणे सोमवार, ८ जून रोजी रात्री ८:३० च्या सुमारास सुमित कोचेटा आपले गोडावून सुरक्षितपणे बंद करून घरी गेले होते.
तथापि, रात्री ९:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या स्क्रॅप मर्चंटमधून प्रचंड धूर निघत असल्याची माहिती त्यांना फोनवरून मिळाली. माहिती मिळताच कोचेटा यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते आणि संपूर्ण स्क्रॅप मर्चंटला आपल्या कवेत घेतले होते. बघता बघता आगीच्या भल्यामोठ्या लोटांनी गोडावूनमधील सर्व साहित्य कचाट्यात घेतले.
यंत्रणांची घटनास्थळी धाव; लोकप्रतिनिधींकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची भीषणता लक्षात घेऊन शहरातील अनेक प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली. यामध्ये महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, मनपातील सभागृहनेते विजयकुमार साबदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन किरण जाधव, नगरसेवक पवन सोलंकर, नगरसेवक अभिषेक पतंगे आणि अकबर माडजे आदींचा समावेश होता. या सर्व नेत्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगीची माहिती घेतली आणि मनपा अग्निशमन दलाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
आमदार अमित देशमुखांच्या सूचनेनंतर साखर कारखान्यांचे बंब पाचारण
महानगरपालिकेचे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, परंतु गोडावूनमध्ये कागद आणि पुठ्ठ्याचा मोठा साठा असल्याने आग सातत्याने भडकत होती. परिस्थितीचे गांभीर्य आणि आगीचे भीषण रूप पाहता अतिरिक्त यंत्रणा वाढवणे अत्यंत गरजेचे होते. ही बाब माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांना समजताच त्यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी तात्काळ ‘विलास सहकारी साखर कारखाना’ आणि ‘ट्वेन्टी-वन शुगर’च्या प्रशासनाला सूचना दिल्या. आमदारांच्या सूचनेनंतर या दोन्ही कारखान्यांचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मनपा आणि कारखान्यांच्या संयुक्त पथकांकडून रात्री उशिरापर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे आणि कूलिंग ऑपरेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
















