लातूर : प्रतिनिधी
आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीत ‘वंशाला दिवा हवा’, ही मानसिकता… त्यातून होणा-या छुप्या स्त्रीभ्रूण हत्या… परिणामी मुलींचे कमी होत जाणारे प्रमाण… ही बाब चिंताजनक आहे.याचे गंभीर परिणामी विचारात घेऊन आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. आता टोल फ्र ी १०४ या हेल्पलाईनवर फोन करून स्त्रीभ्रूण हत्येची तक्रार करता येणार आहे. विशेष म्हणजे ही माहिती देणा-याला लाखाचे बक्षीस मिळणार आहे.
गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे असा गर्भपात करणारे हॉस्पिटल, केंद्र, डॉक्टर यांना पकडून दिल्यास, आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मदत केल्यास बक्षीस मिळणार आहे. राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ आणि ‘एमटीपी’ या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना राबविण्याचे धोरण आरोग्य विभागाने अवलंबले आहे.
‘पीसीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणा-या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर त्यावर यशस्वी अंमलबजावणी झाल्यास तक्रारदारास शासनाच्या वतीने १ लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आधी तक्रार द्यायची आहे तसेच त्यांच्या नातेवाइकाला गर्भवती महिलेने लिंगनिदान केंद्र किंवा गर्भपात करणा-या ठिकाणी डिकॉय केस जाऊन मदत करणे अपेक्षित आहे.